Thane Crime News : वर्तकनगर पोलिसांची कामगिरी लाखात भारी; 10.50 लाख रुपयांचे 35 मोबाइल नागरिकांना परत

•CEIR पोर्टलच्या विशेष पथकाने ट्रेस केले हरवलेले, गहाळ,चोरी झालेले मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्त
ठाणे :- मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ होताच संबधित व्यक्ती पोलिस ठाण्यात धाव घेतात. अशा गहाळ, चोरी झालेल्या मोबाईल फोनचा राज्यातून तसेच परराज्यातून वर्तकनगर पोलिसांनी शोध घेतला. असे 10.50 लाखांचे 35 मोबाइल फोन नागरिकांना परत मिळवून दिले. त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
वर्तक पोलिस ठाण्यात नागरिकांना मुद्देमाल परत देण्यात आला. ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतून मोबाईल फोन चोरी, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. 20 फेब्रुवारी 2025 ते आज पर्यंत विशेष मोहीम राबवून अशा फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गुन्हे निरीक्षक मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, पोलीस शिपाई नागरे यांचे विशेष पथक स्थापन केले.सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) या पोर्टलव्दारे चोरी, हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन या विशेष पथकाने ट्रेस केले. परराज्यातून आणले मोबाईल हरवलेले, गहाळ व चोरी झालेले मोबाईल हे वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार, दिल्ली, आसाम, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे ट्रेस झाले. संबंधित मोबाईल ज्या व्यक्तींच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले.
पोलीसांची कामगिरी
वर्तकनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल चिंतामण , पोलीस शिपाई नागरे यांनी केली आहे.