IND Vs NZ : ‘सूर्या’चा उदय आणि इशानचा धमाका! भारताचा किवींवर ७ गडी राखून विजय; मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

•रायपूरमध्ये विक्रमी पाठलाग; सूर्याचे 467 दिवसांनंतर अर्धशतक, तर इशानची न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान फिफ्टी; 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची सरशी
IND vs NZ 2nd T-20 :- कर्णधार सूर्यकुमार यादवचा अंगावर शहारे आणणारा फॉर्म आणि इशान किशनची आक्रमक फलंदाजी, यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. 209 धावांचे विशाल आव्हान भारताने अवघ्या 15.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासोबतच भारताने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आपल्या सर्वोच्च धावसंख्येच्या यशस्वी पाठलागाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सूर्या-इशानचे वादळ 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. अभिषेक शर्मा (0) आणि संजू सॅमसन (6) स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी किवी गोलंदाजांची कत्तल सुरू केली. या जोडीने केवळ 55 चेंडूंत 122 धावांची तुफानी भागीदारी रचली. इशानने 32 चेंडूंत 76 धावा कुटल्या, तर सूर्यकुमारने 37 चेंडूंत नाबाद 82 धावांची खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद केली.
टीकाकारांना ‘सूर्या’चे उत्तर; तब्बल 23 डावांनंतर अर्धशतक गेल्या दीड वर्षांपासून सूर्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तब्बल 467 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अर्धशतक झळकावले. सुरुवातीला इशानला संधी देणाऱ्या सूर्याने नंतर स्वतः गिअर बदलला आणि 9 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 82 धावांची खेळी सजवली. त्याला अखेरच्या टप्प्यात शिवम दुबेने (36 नाबाद) मोलाची साथ दिली.
इशान किशनचा ऐतिहासिक विक्रम दोन वर्षांच्या पुनरागमनानंतर इशानने आपल्या फलंदाजीतील धार पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याने केवळ 21 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावले.
न्यूझीलंडचा डाव आणि भारतीय फिरकीपटूंचे नियंत्रण तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 208 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉन्वेने पहिल्याच षटकात 18 धावा कुटल्यानंतर किवी संघ 230 च्या पार जाईल असे वाटत होते. मात्र, कुलदीप यादव (2/35) आणि वरुण चक्रवर्ती (1/35) या फिरकी जोडीने मधल्या षटकांत धावांवर अंकुश ठेवला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र (44) आणि कर्णधार सँटनर (47 नाबाद) यांनी झुंज दिली, पण ती भारताच्या फलंदाजीसमोर तोकडी ठरली.



