Sanjay Nirupam On Uddhav Thackeray : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, सहापैकी एकही जागा…
•काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सहापैकी एकही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, तसेच सहापैकी पाच उमेदवार पडणार असल्याचे सांगितले
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Nirupam-On-Uddhav-Thackeray-1024x576.jpg)
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी केली असली तरी त्यांच्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असे म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार नसल्याचे संजय निरुपम यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेला नसल्याचे दिसून येत आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम देखील काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना तीन लाख दहा हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचा उमेदवाराचा या निवडणुकीत विजय झाला होता. त्याला पाच लाख 70 हजार मते मिळाली होती. मात्र, या मध्ये साडेतीन लाख मते ही भाजपची असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. तरी शिवसेनेमध्ये आता फुट पडली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे किती मतदार आहेत, याचा अंदाज बांधणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. असे असताना केवळ उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे, अशा चर्चेवर त्यांना मुंबईतील पाच जागा देणे, हे चुकीचे असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबईमध्ये लोकसभेच्या जागा संदर्भात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर संजय निरुपम यांनी याआधी देखील टीका केली होती. उद्धव ठाकरे गटाला पाच जागा देण्यावर त्यांचा आक्षेप होता. संजय राऊत यांनी स्वतःचा पक्ष संपवला आहे, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवला आहे, आता ते काँग्रेस पक्ष संपवण्याचे काम करत असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये फुट पडलेली आहे. असे असताना काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला सहापैकी तीन जागा हव्या होत्या. मात्र अखेर एकच जागा काँग्रेसला मिळाली असल्याचे ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर अशी जोरदार टीका केली आहे.