Mahadevi Elephant : नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी सरकारचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार

•मुख्यमंत्र्यांनी ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार
मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातच्या ‘वनतारा पशूसंवर्धन केंद्रातून’ परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) जाहीर केल्यानुसार, नांदणी मठाला पाठिंबा देत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. या संदर्भात, आज (6 ऑगस्ट) त्यांनी ‘वनतारा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परतीचा ‘अॅक्शन प्लॅन’ निश्चित केला.
या बैठकीनंतर फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरून माहिती दिली. ते म्हणाले की, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकार न्यायालयात स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडेल आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सर्व निकष पूर्ण करून महादेवीच्या काळजीसाठी विशेष पथक तयार करेल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. या निर्णयामुळे नांदणी मठातील हत्तीणीच्या परतीची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.




