शिवकालीन वारशाला जागतिक मान्यता! शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

•देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया “मोदींच्या पुढाकारामुळे शिवरायांचे किल्ले जगाच्या नकाशावर”
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि वास्तुशैलीचा अभूतपूर्व वारसा लाभलेल्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 किल्ला सामील आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आनंदाचे वातावरण आहे.
युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले 12 किल्ले
साल्हेर,शिवनेरी,लोहगड,खांदेरी, रायगड,राजगड,प्रतापगड,सुवर्णदुर्ग,पन्हाळा,विजयदुर्ग,सिंधुदुर्ग,जिंजी (तामिळनाडू).
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक घडामोडीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले,“सर्व शिवप्रेमींना मनापासून अभिनंदन! छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गौरवाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. सात वेगवेगळ्या संस्था नामांकनासाठी गेल्या असताना पंतप्रधानांनी शिवरायांच्या किल्ल्यांची निवड करणे हे त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे.”
ते पुढे म्हणाले,“या 12 किल्ल्यांचं वैशिष्ट्य, स्थापत्यशैली, भौगोलिक निवड आणि अभेद्य रचना याचा सविस्तर अभ्यास करून आम्ही युनेस्कोसमोर मांडणी केली. एका वर्षाचा सखोल अभ्यास, निरीक्षणं आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे हे सादर करण्यात आले. यामध्ये भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची आणि आमचे प्रयत्न निर्णायक ठरले.”


