•मुख्यमंत्री कार्यालयासह महसूल, अन्न व नागरी पुरवठा विभागांना नवे अप्पर मुख्य सचिव लाभले
मुंबई :- राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासकीय यंत्रणेतील फेरबदलांचा धडाका सुरूच आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या बदल्यांच्या सत्रात आजही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अनेक महत्त्वाच्या पदांवर नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. यात मुख्यमंत्री कार्यालयापासून ते महसूल आणि जिल्हा पातळीवरील प्रशासनात मोठे बदल झाले आहेत.
अझीझ शेख, जे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक होते, त्यांची आता धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मित्तल यांच्या नाशिकमधील कार्यकाळात त्यांनी ‘सुपर 50’, ‘सीएसआर फंडातून बसेस’, दिव्यांगांसाठीचे उपक्रम आणि जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अशा अनेक महत्त्वाच्या योजना आणि उपक्रम यशस्वीपणे राबवले होते, ज्यामुळे त्यांच्यावर आता जालन्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जालना जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची आता थेट ठाणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे सध्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उद्या (1 ऑगस्ट रोजी) निवृत्त होत असल्याने पांचाळ यांच्यावर ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, प्रशासनाच्या शीर्षस्थानीही महत्त्वाचे बदल झाले आहेत. विकास खारगे, जे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव होते, त्यांची आता अप्पर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर बदली झाली आहे. तर अनिल डिग्गीकर, जे अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग म्हणून कार्यरत होते, त्यांची बदली आता अप्पर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…