Thackeray VS Shinde : “शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं नामोनिशाणही राहणार नाही!” — उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर कडाडून हल्ला

• “भाजप भ्रष्टांचं मोकळं दालन झालंय, तुरुंगाबाहेरच सदस्य नोंदणी सुरू”
मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन सायन येथील षण्मुखानंद सभागृहात जलशोभायुक्त वातावरणात पार पडला. मात्र, या सोहळ्यात केवळ उत्सवच नव्हता, तर तो ठरला भाजप आणि शिंदे गटाविरोधातील आक्रमक रणघोषाचा मंच. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रचंड आक्रमक भाषेत दोन्ही गटांवर टीका करत, आपल्या शैलीत इशारे दिले—”ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचं नामोनिशाणही ठेवणार नाही!”
ठाकरे म्हणाले, “आमची शिवसेना 59 वर्षांची झाली तरी विचार, नेता, भगवा आणि दैवत एकच आहे. आणि आता महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते मी करणारच.” त्यांनी युतीसंदर्भात राज ठाकरे यांच्याशी सकारात्मक संकेतही दिले.
भाजपच्या भ्रष्टाचारावर सडकून टीका करताना, त्यांनी थेट तुरुंगाबाहेर सदस्य नोंदणी सुरू असल्याचा आरोप केला. “अतिरेकी मिळत नाहीत, ते भाजपात गेले का? जेलबाहेर स्टॉल टाकून सदस्य करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती वार केला.
“नीतेश राणेंवर बोचरी टीका; पेंग्विन, बदक, कोंबडीचा संदर्भ देत टोला”
नीतेश राणेंवर त्यांनी अतिशय बोचरी आणि विनोदी शैलीत टीका करत म्हणाले, “तुझी उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… डोळे कोणाचे आहेत माहीत नाही!” अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित केला.
मुंबईतील 3 हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्यावरून ठाकरे संतापले. “आज भाजपचे कार्यकर्ते सतरंजीच्या खाली गेलेत, उपरे नाचत आहेत. स्वाभिमान असेल तर बाहेर या!” असा स्पष्ट संदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार का, या चर्चांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बातम्या सुरू आहेत… काय होणार, कसले होणार, होणार की नाही… कळेलच. पण जे कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार!” अशा सूचक शब्दांत त्यांनी युतीसंदर्भात सकारात्मकतेचा सूर लावला.
याच मुद्द्याला पुढे नेत ठाकरे म्हणाले, “मराठी माणसांची शक्ती एकवटू नये, म्हणून भाजपचे ‘मालकांचे नोकर’ हॉटेलांमध्ये भेटीगाठी घेत आहेत. त्यांना भीती वाटते—मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर अदानीचे काय होणार?”
“आता प्रयत्न सुरू आहेत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून. जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात, ते शेठजींच्या नोकरांचेही नोकर आहेत,” अशा कडवट भाषेत ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जहरी हल्ला चढवला.



