
Worli News : 14 ऑगस्ट रोजी माटुंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरवाटप सोहळा; 40 मजली इमारतीत स्थलांतर
मुंबई :- मुंबईच्या ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळींमधील पुनर्विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असून, 14 ऑगस्ट रोजी 556 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांचा ताबा दिला जाईल. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरांचे वाटप होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक घरे बांधली जात आहेत. त्यापैकी 13 इमारतींपैकी दोन इमारतींचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या नव्या आणि प्रशस्त घरांची रहिवासी आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
या सोहळ्यात प्रतीकात्मक स्वरूपात 15 रहिवाशांना सदनिकांचा ताबा दिला जाईल. यामध्ये वरळीतील इमारत क्रमांक 30,31 आणि 36 मधील एकूण 556 रहिवाशांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे रहिवासी आता 180 चौरस फुटांच्या घरातून थेट 500 चौरस फुटांच्या अत्याधुनिक आणि 40 मजली उत्तुंग इमारतीत स्थलांतरित होणार आहेत. यामुळे त्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल होणार आहे.


