Raj Thackeray : “फडणवीसांनी जे जमवलं ते कुणालाही जमलं नाही!” – राज ठाकरे

•“बाळासाहेबांनाही जे शक्य झालं नाही, ते फडणवीसांनी साध्य केलं”,माझ्यासाठी कोणताही वाद नव्हे, तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा”
मुंबई | प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधातील सरकारच्या माघारीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं,” असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप नेत्यांच्या भूमिकेचं अप्रत्यक्ष कौतुक केलं.
राज ठाकरे म्हणाले, “माझ्या मुलाखतीत मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस माझ्यासाठी मोठा आहे. त्या वक्तव्यापासून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. पण आज एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो – ज्यांना राज्यातील कोणीही एकत्र आणू शकलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी शक्य करून दाखवलं.”
या वक्तव्यातून राज ठाकरेंनी आपण आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर उभं राहणं हे फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे शक्य झालं, हे सूचकपणे सांगितलं. “आम्हा दोघांना एकत्र आणणं, हे फडणवीसांना जमलं,” अशी थेट कबुली देत त्यांनी राजकीय चर्चांना नवा सूर दिला आहे.
या विधानानंतर राजकीय पटलावर नव्या समीकरणांची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाकरे बंधूंमधील दुरावा संपवून, मातृभाषेच्या मुद्द्यावर एकत्र येणं आणि त्या निमित्ताने भाजपशी सूत जुळवण्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले आहेत, असे विश्लेषकांचे मत आहे.


