Sanjay Raut : “मुंबई अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे!”

•काँग्रेसने वेगळी भूमिका घेऊ नये; मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे वातावरण – संजय राऊत यांची भाई जगताप यांना मनधरणी
मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे गटासोबत महापालिका निवडणूक एकत्र न लढण्याचा जो इशारा दिला आहे, त्यावर शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
राऊत यांनी स्पष्ट केले की, राज्यातील कोणताही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार असला, तरी ठाकरे गट मित्रपक्षांना अडचणीत आणणारी कोणतीही भूमिका घेणार नाही.
भाजप आणि अदानींवर टीका
संजय राऊत म्हणाले, “आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आणि आम्हाला मुंबई अदानींच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे.” यामुळे काँग्रेस पक्षातील मराठी नेतृत्वाने मुंबईवरील या संकटाचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.
‘एका दिवसाच्या प्रसिद्धीसाठी’
भाई जगताप यांनी काँग्रेसचा महापौर होईल, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “असे विधान एका दिवसाच्या प्रसिद्धीसाठी असतात.” त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उदाहरण दिले, जेव्हा मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते. आज पुन्हा तसंच वातावरण आहे, असे ते म्हणाले. बिहारमध्ये काँग्रेस आणि तेजस्वी यादव वेगवेगळ्या निवडणुका लढवत असले तरी, तिथे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे नाहीत, त्यामुळे ‘आम्हाला तेही नको, हेही नको’ असे म्हणून चालणार नाही, असे सांगत लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्यासाठी ही निकराची लढाई आहे, हे सहकाऱ्यांनी समजून घ्यावे, असे आवाहन राऊत यांनी केले.
महापौर पदावर स्पष्ट भूमिका
काँग्रेसचा महापौर व्हावा, या भूमिकेवर बोलताना राऊत यांनी आठवण करून दिली की, “आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता, पण होऊ शकला नाही. इंडिया आघाडीतही आम्ही राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मुंबईच्या महापौरपदाबद्दल इतके घेऊन बसू नका. “तुम्ही 27 महानगरपालिकेचे महापौर काँग्रेसचे करा, आम्हाला काही अडचण नाही,” असे सांगत, भाजपला रोखणे हे आमचे प्राधान्य आहे. मराठी मातीतील व्यक्ती महापौर होण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आणि अनेकदा काँग्रेसचे सहकार्य मिळाले हे विसरता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.


