Ajit Pawar : पवार कुटुंबाचा पाडवा होणार नाही! कुटुंबातील दुःखद घटना आणि मराठवाडा, पूरग्रस्त भागातील परिस्थितीमुळे अजित पवारांचा निर्णय

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना स्पष्ट केले कारण
पुणे :- महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या पवार कुटुंबातील दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाची उत्सुकता यावर्षी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी पवार कुटुंबाचा पाडवा साजरा होणार नाही, अशी घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी यामागची दोन प्रमुख कारणे स्पष्ट केली.
दुःखद घटना आणि शेतकरी
अजित पवार म्हणाले, “यावर्षी पाडवा होणार नाही. कुटुंबात एक दुःखद घटना घडली आहे, त्यामुळे कोणताही मोठा उत्सव साजरा केला जाणार नाही.”
यासोबतच त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील पूरग्रस्त भागातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. “मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि पूरग्रस्त भागात वाईट परिस्थिती आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी अनेक जण पूरग्रस्तांच्या घरी फराळ आणि शिधा पाठवत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
32 हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. ते म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. “राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके मोठे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले आहे,” असा दावा त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवडमध्ये जनसंवाद
दिवाळीच्या वातावरणातही अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रम घेतला. यावेळी शेकडो नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन भेट घेतली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पिंपरी-चिंचवड शहराकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.



