Maharashtra Politics : दिल्लीत उद्धव ठाकरेंची ‘शेवटची’ जागा चर्चेत; शिंदे गट आणि भाजपचा ठाकरेंवर निशाणा

•’इंडिया’ आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते मागील रांगेत, विरोधकांनी डिवचले
मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी ते उपस्थित होते, मात्र याच बैठकीतील एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसलेले दिसत आहेत.
ही बैठक मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी या विषयावर एक प्रेझेंटेशन दिले. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे मागे बसलेले दिसून येतात.



भाजपचे केशव उपाध्य काय म्हणाले?
भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, तेव्हा किती सन्मान उद्धव ठाकरेंना किती सन्मान होता. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत होते. 2019 लोकसभा निवडणूकीच्यावेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली, त्यातून मान गेला, सन्मान गेला… हातात पडलं काय तर…आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग…, असा टोला केशव उपाध्य यांनी लगावला आहे.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?
बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे. तुमच्यापेक्षा एक-एक खासदारवाले पक्ष बरे… त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं… महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.



