Mumbai Crime News : ‘सरकारी नोकरी’चं आमिष… तरुणांची साडेसहा लाखांची फसवणूक!

•सीमा शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष; विश्वासात घेऊन दस्तऐवज आणि लाखो रुपये उकळले
मुंबई | सरकारी नोकरी मिळवून देण्याचे गोड आश्वासन देत दोन तरुणांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. सीमा शुल्क (कस्टम) विभागात भरती लावण्याचे आमिष दाखवत आरोपींनी तरुणांना जाळ्यात ओढले आणि पैसे घेऊन अचानक गायब झाले. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित राठोड (वय 40) हे अंधेरी येथे वास्तव्यास असून खासगी विमान कंपनीत ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी परिचय असलेल्या पार्थ पटेल याने कस्टम विभागात चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे सांगितले. पुढे त्याने राठोड यांची ओळख एका सुभाषचंद्र नावाच्या व्यक्तीशी करून दिली, जो स्वतःला कस्टम विभागातील व्हिजिलन्स ऑफिसर असल्याचे सांगत होता. नोकरीच्या नावाखाली दोघांनी मिळून राठोड यांच्याकडून हळूहळू 3 लाख 70 हजार रुपये घेतले, तसेच सर्व आवश्यक कागदपत्रेदेखील जमा करून घेतली.
परंतु ठरल्याप्रमाणे कोणतीही नोकरी न मिळाल्याने सुमित राठोड यांनी जेव्हा परतफेडीची मागणी केली, तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागले आणि अखेर संपर्कही तोडला.
त्यानंतर, निखिल मेमाणे या दुसऱ्या तरुणालाही याच आरोपींनी सीमा शुल्क विभागातील नोकरीचं आमिष दाखवून 2 लाख 75 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले. एकूण मिळून या दोघांची सुमारे 6 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
सुमित राठोड यांच्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी पार्थ पटेल आणि सुभाषचंद्र यांच्याविरोधात फसवणूक, बनावटीने विश्वास संपादन करणे, आणि कट रचणे यांसारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरु आहे.


