2006 साखळी स्फोट प्रकरणातील 12 आरोपींची सुटका! – आता सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार निर्णायक लढत

•मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करत सुटकेचे आदेश; सरकारकडून सुप्रीम कोर्टात आव्हान
मुंबई :- 2006 मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या धक्कादायक साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी शिक्षा झालेल्या 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवत तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय सोमवारी देण्यात आला असून, याला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.
या स्फोटांमध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक जखमी झाले होते. सत्र न्यायालयाने 2015 मध्ये दिलेल्या निकालात पाच आरोपींना फाशीची, आणि सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या सर्व शिक्षा रद्द करून साक्ष-पुराव्यांमध्ये सुसंगती नाही, असे नमूद करत तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात नमूद केलं की, स्फोटकांची नेमकी रचना, नकाशे व शस्त्रं या गोष्टी आरोपींना थेट जोडत नाहीत. तपास यंत्रणेकडून बॉम्बचा प्रकार स्पष्टपणे सिद्ध करण्यात अपयश आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा निकाल धक्कादायक असून सरकार याला सर्वोच्च न्यायालयात तातडीने आव्हान देणार आहे.” त्यानुसार राज्य सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक आरोपी कमाल अन्सारी याचा मृत्यू 2021 मध्ये झाला होता. उर्वरित 12 आरोपींना आता जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष न्यायालयाने या आरोपींविरोधात आतंकवाद, देशद्रोह, आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणण्याचे आरोप सिद्ध करत शिक्षा सुनावली होती.
आता या प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. देशभरात या प्रकरणावरून नव्याने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. न्यायालयीन यंत्रणा, तपासातील त्रुटी आणि पुराव्यांवरील विश्वासार्हता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा झडणार हे निश्चित.



