
Sanjay Raut : ‘गुलाबो गँग’ म्हणत शिंदे गटाची हेटाळणी; ‘ठाकरे बंधूंचे उत्तम चालले आहे’ म्हणत राज-उद्धव भेटीवर केले भाष्य
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत Sanjay Raut आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीवर चौफेर हल्ला चढवत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर दावा केला.
‘अमित शहाच कोथळा काढतील’
राऊत म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंची शिवसेना असे म्हणायला तयार नाही. एक दिवस अमित शहाच शिंदेसेनेचा कोथळा बाहेर काढतील.” त्यांनी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीतील ‘लक्ष्मीदर्शना’च्या विधानाचा समाचार घेताना शिंदे गटाचा उल्लेख ‘गुलाबो गँग’ असा केला.
‘लक्ष्मीदर्शन’वर टीका: “गुलाबो गँगने 1 डिसेंबरला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी एका मतासाठी 10 ते 15 हजार असे लक्ष्मीदर्शन होत आहे.”
निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त: ते म्हणाले, “नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत पैशांचा एवढा खेळ कधीही झाला नव्हता. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या 4-5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे घडले आहे.”
ठाकरे बंधूंच्या भेटीवर भाष्य
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवर बोलताना राऊत यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
“राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली. त्यात राज यांनी उद्धव यांना एक प्रेझेंटेशन दाखवले. त्यांचे जे काही चालले आहे, ते अतिशय उत्तम चालले आहे.”
“भाजप हा मुंबईचा एक नंबरचा शत्रू आहे. मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. हे थांबवायचे असेल, तर राज ठाकरे यांना सोबत घेणे आवश्यक आहे.”
काँग्रेसला आव्हान: बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल, तर त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात, आमची हरकत नाही, असे राऊत म्हणाले.
प्रकृतीवर भाष्य
प्रकृतीबद्दल बोलताना राऊत यांनी आपण एका महिन्याहून अधिक काळ कैदखान्यात असल्याचे (घरातील व रुग्णालयातील) सांगितले.
“माझी तब्येत हळूहळू सुधारत आहे. अजूनही सुधारणा होईल. उपचार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बरा होऊन येईन. तुरुंगात असतानाच हा आजार सुरू झाला होता.”
शुभेच्छुक: त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि एकनाथ शिंदे या सर्वांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगितले. “राजकारणापलिकडे नाती जपायची असतात,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या टीकेला फारसे महत्त्व न देता, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “संजय राऊत बरे झाले याचा मला आनंद आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आमचे काम करतो. संजय राऊत रोज काय बोलतात, त्याला उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही.”


