Swami Anand Swaroop : स्वामी आनंद स्वरुप यांचं उघड आव्हान : “मुंबईत येतोय, औकात असेल तर थांबवून दाखवा”

Swami Anand Swaroop : मी मराठी शिकणार नाही’ म्हणत व्यावसायिक सुशील केडिया यांचं वादग्रस्त विधान; ठाकरे बंधूंना खुले आव्हान
मुंबई | इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय आणि मीरारोडमधील ‘मराठी न बोलणाऱ्याला’ मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता मराठी विरुद्ध अमराठी असा ध्रुवीकरणाचा वाद पेटला आहे. या वादात आता हिंदुत्ववादी संघटना, व्यावसायिक आणि ठाकरे बंधूंच्या विरोधकांचाही सहभाग दिसू लागला आहे.
प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी “मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा!” असा खवळवणारा संदेश एक्सवर पोस्ट करत, थेट राज ठाकरे यांना टॅग केले. त्यामुळे मराठीप्रेमींमध्ये संताप उसळला आहे.
स्वामी आनंद स्वरुप यांचं थेट आव्हान – “हात तोडून नाही टाकले तर बघा”
या वादात आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी थेट उडी घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून खोल आव्हान दिलं आहे. एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले:
“मी मुंबईत येईन आणि हिंदीत बोलेन. पाहूया, कोण मला थांबवतोय!”
“औकात असेल तर हात लावून दाखवा, नाहीतर मीच हात तोडून टाकीन,” असा विवादस्पद इशारा त्यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे.
या विधानांमुळे मुंबईच्या वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मराठीसाठी एकत्र येण्याचा निर्धार करणाऱ्या राज आणि उद्धव ठाकरे यांचा 5 जुलैचा मोर्चा जीआर रद्द झाल्यामुळे आता विजयी मेळाव्यात रूपांतरित झाला आहे. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या या मेळाव्याला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
मात्र, गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींमुळे स्पष्ट होतंय की, या मेळाव्याच्या केंद्रस्थानी ठाकरे बंधूच असणार आहेत. राज्यातील मराठी अस्मिता, भाषेची सक्ती आणि प्रादेशिक असंतोष या मुद्द्यांभोवती हा मेळावा आकार घेत असल्याचं चित्र आहे.


