CM Devendra Fadnavis : पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधली पंतप्रधानांशी भेट

PM Modi On Maharashtra : एनडीआरएफच्या माध्यमातून मदत देण्याची मागणी; पंतप्रधानांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याचे दिले निर्देश
ANI :- राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी केली. पंतप्रधानांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत भरघोस मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पंतप्रधानांनी दिले मदतीचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “माझ्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर केले आहे. यामध्ये एनडीआरएफ (NDRF) च्या माध्यमातून राज्यातील पूरग्रस्तांसाठी तातडीने मोठी मदत देण्याची मागणी आम्ही केली आहे.”
या मागणीवर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरात लवकर नुकसानीचा प्रस्ताव (Proposal) केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रस्ताव पाठवण्यासाठी घाई नाही
केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवणार, यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, “या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. एकदा हा अहवाल पाठवला की, त्यात नंतर बदल करता येत नाही.”
यामुळे, पूर्ण नुकसानीचा अंदाज आल्यानंतरच आणि नुकसानीची संपूर्ण आकडेवारी निश्चित झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ, कोणतीही तुटपुंजी किंवा घाईगडबडीत मदत न मागता, थेट मोठी आणि आवश्यक ती मदत केंद्राकडून मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.



