Vasai Crime News : नायगाव पोलिसांची मोठी कारवाई! 20 किलो गांजासह चार आरोपींना अटक

•गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना रंगेहाथ पकडले; तपासात दोन महिलांचा सहभाग निष्पन्न
वसई :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 20 किलो 669 ग्रॅम वजनाचा 4 लाख 54 हजार 708 किंमतीचा गांजा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दोन पुरुष व दोन महिला अशा एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना
11 ऑक्टोबर 2025 रोजी नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी आशा नगर, कोल्ही गाव (वसई) परिसरात फिरत होते. यावेळी अनिकेत दशरथ राऊत (वय 19, नायगाव पूर्व) आणि अभिषेक जसवंत सिंग (वय 24, नायगाव पूर्व) हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांच्या खांद्यावर आणि हातात खाकी रंगाच्या सेलोटेपने गुंडाळलेले गांजाचे पुडके आणि कापडी पिशवी आढळली.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात 20 किलो 669 ग्रॅम वजनाचा गांजा आणि त्यांचे मोबाईल असा एकूण 4 लाख 85 हजार 708 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महिला पुरवठादारांचा सहभाग निष्पन्न
दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हा गांजा अंमली पदार्थ दोन महिलांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आयशा शिवदत्त सिंग (वय 27) आणि मंदाकिनी सिताराम थोरात (वय 56) या दोन्ही महिलांनाही अटक केली आहे.
या चारही आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट, 1985 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.



