Sharad Pawar : जयंत पाटलांवरील आक्षेपार्ह टीकेमुळे राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी; पवारांनी व्यक्त केला संताप

‘पडळकरांच्या टीकेवरुन शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; ‘अशा वाचाळवीरांना आवरा’, पवारांनी फडणवीसांना खडसावले
मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पडळकरांच्या या बेताल वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. या प्रकारानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात थेट हस्तक्षेप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी फोनवर फडणवीसांना सांगितले की, “अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा.”
गोपीचंद पडळकर यांनी जत येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. “जयंत पाटील हा गोपीचंद पडळकरसारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असे आक्षेपार्ह विधान करत त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचाही उल्लेख केला होता. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आक्रोश आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, असे म्हणत फडणवीसांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी या वाचाळवीरांवर काहीतरी ठोस कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



