Sanjay Raut : “उद्धव-राज ठाकरे यांची युती पक्की!” संजय राऊत यांचा मोठा दावा; ठाणे मनपात ’75 पार’चा नारा

•’दो ठाकरे सब पे भारी’, मराठी माणसाला वाचवण्यासाठी मनसे-शिवसेना (ठाकरे) एकत्र लढणार; महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत नसणार
मुंबई :- शिवाजी पार्क येथील दीपोत्सव सोहळ्यात ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. “दोन ठाकरे बंधूंची युती पक्की आहे,” असे स्पष्ट आणि मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. तसेच, ज्यांना या युतीत सोबत यायचे आहे, त्यांचे स्वागत करू, असेही ते म्हणाले.
‘ही युती पक्की आहे’
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ही युती पक्की आहे. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल, त्यांचं आम्ही स्वागत करू. मी महाविकास आघाडीबद्दल देखील वारंवार सांगत आलो आहे. जे सोबत येतील त्यांना आम्ही घेऊन पुढे जाऊ.”
स्थानिक निवडणुकीसाठी आघाडी नाही
राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का, या प्रश्नावर संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले. “मी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी होती, तर इंडिया ब्लॉक हा लोकसभा निवडणुकीसाठी होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशी कुठलीही आघाडी नसणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप अशा प्रकारची कुठलीही चर्चा कोणत्याही पक्षांमध्ये झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई आणि ठाण्यात एकत्र लढणार
राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत. “मुंबईसाठी व मराठी माणसाला वाचवण्यासाठी आम्ही आणि मनसे एकत्र लढणार आहोत. ठाण्यात देखील आम्ही एकत्र लढणार आहोत आणि सत्तेत येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘दोन ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करतील’
महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ’70 पार’चा नारा दिला असताना, संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, “आमचा नारा ’75 पार’चा आहे. दोन ठाकरे एकत्र आल्यावर काहीही शक्य होऊ शकतं. ‘दो ठाकरे सब पे भारी’. निवडणूक लढण्यावर चर्चा होत राहील. हा सोबत येणार का तो सोबत येणार हे अजून ठरलं नसलं, तरी या क्षणी दोन ठाकरे हे एकत्र असून ते सर्वांच्या ठिकऱ्या करतील.”


