Sanjay Raut : “मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी!” — संजय राऊत यांचा फडणवीस-शिंदेंना थेट इशारा

•“मराठी अस्मिता उभी राहिली ती गिरणी कामगारांच्या घामातून, धनाढ्यांच्या पैशातून नाही”
मुंबई | राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरु झालेला वाद आता मराठी अस्मितेच्या संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडलं आहे.
“मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी. तुमच्या खुर्च्या शिवसैनिकांच्या बलिदानामुळे आहेत, हे विसरू नका,” असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
गुजरातींचं योगदान कबूल, पण मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही”संजय राऊत म्हणाले की,“गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकास केला हे मान्य. पण त्यामुळे संपत्ती, पैसा त्यांनीच कमावला, उपकार केले असे म्हणणं म्हणजे मराठी माणसाचा अपमान आहे.”त्यांनी ठामपणे नमूद केलं की,”मुंबई ही मराठी गिरणी कामगारांच्या घामातून उभी राहिलेली आहे. ती धनाढ्य शेठजींच्या पैशातून उभी राहिलेली नाही.”
मुख्यमंत्र्यांच्या ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ घोषणेबाबत रोष व्यक्त करत राऊत म्हणाले,
“गुजरात आणि महाराष्ट्र कधी एकत्र होते हे शिंदेंना माहिती नाही. पण तरीही मोदी, शहा किंवा योगी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नाहीत. मग शिंदेंनीच का अस्मिता पायदळी तुडवायची?”त्यांनी शिंदेंना ‘मंत्रिमंडळातील सर्वात कच्चं मडकं’ ठरवत,”सध्या ते गोंधळात असून, असंबद्ध विधानं करत आहेत,” अशी सडकून टीका केली.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या वतीने 5 जुलै रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला आहे.”हा मेळावा पूर्वनियोजित नव्हता, पण सरकारने माघार घेतल्यानंतर मराठी जनतेच्या पाठिंब्यामुळे तो आयोजावा लागला,” असे राऊत यांनी सांगितले.


