महाराष्ट्र

Raigad Rain Update : रायगडमध्ये पावसाचा हाहाकार: खोपोलीत पूरसदृश स्थिती, कुंडलिका नदी इशारा पातळीवर!

•रेड अलर्ट कायम, भिरा धरणातून विसर्ग सुरू; जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

रायगड: जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कर्जत, खालापूर, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी जारी केलेला रेड अलर्ट अजूनही कायम आहे.

गुरुवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रात पावसाने काहीशी उसंत घेतली होती, मात्र संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला आणि रात्रभर मुसळधार सरी कोसळत होत्या. शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार कायम असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनाही घडल्या आहेत.

खोपोली आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा:

अतिवृष्टीमुळे खोपोली शहराच्या सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहारी आणि काटरंग परिसर पाण्याखाली गेल्याने स्थानिक प्रशासनाने खोपोलीतील शाळांना परिस्थितीनुसार सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, भिरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून, 41.60 घन मीटर प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग कुंडलिका नदीत सुरू आहे. यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा शहर आणि कुंडलिका नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अंबा आणि पाताळगंगा नद्याही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत (शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत) जिल्ह्यात 70.72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये माथेरानमध्ये सर्वाधिक 144 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. इतर तालुक्यांमधील आकडेवारी अशी: पोलादपूर 124 मिमी, कर्जत 122 मिमी, माणगाव 97 मिमी, पेण 94 मिमी, महाड 83 मिमी, खालापूर 75 मिमी, सुधागड 63 मिमी आणि अलिबाग 50 मिमी.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 02141-222118 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0