Ahilyanagar Crime News : शाळेतील शत्रुत्वाचे थरारक रूपांतर — आठवीच्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्याची हत्या!

•क्रिकेटच्या वादातून घेतला क्रूर सूड; टिफिनवेळी चाकूने हल्ला
अहिल्यानगर | सर्जेपुरा परिसरातील सीताराम सारडा शाळेत बुधवारी दुपारी घडलेल्या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. क्रिकेटच्या किरकोळ वादातून आठवीच्या वर्गातील एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला.
ही घटना लंच ब्रेकदरम्यान घडली. शाळेच्या वर्गात बसून टिफिन खाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याकडे आरोपी विद्यार्थ्याने रोखून पाहिले. नजरेतूनच पुन्हा वाद सुरू झाला आणि क्षणातच आठवीतील विद्यार्थ्याने जवळचा चाकू काढत त्याच्या पोटावर व गळ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
दोघेही एकाच शाळेत शिकत असून, याआधी सुद्धा त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी मृत मुलाच्या कुटुंबीयांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती.
या घटनेने पालकांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.



