
Team India Asia Cup 2025 : स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये; शुबमन गिल उपकर्णधार, तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला
BCCI :- आशिया चषक 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणारी ही स्पर्धा यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, ज्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला तयारीची मोठी संधी मिळणार आहे.
सूर्यकुमारकडे नेतृत्त्व, गिल उपकर्णधार
फलंदाज सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल, तर युवा सलामीवीर शुबमन गिल त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाच्या सलामीसाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची निवड करण्यात आली आहे, तर तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघाचा भाग असतील. यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे पर्याय उपलब्ध आहेत.
गोलंदाजी आणि ‘फिनिशर’
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यावर असेल. फिरकी गोलंदाजीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव सांभाळतील. मॅच फिनिशरच्या भूमिकेसाठी युवा खेळाडू रिंकू सिंगची निवड करण्यात आली आहे, ज्याने अलीकडच्या काळात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून, दोन्ही देशांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा एक थरारक सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.


