Pradnya Satav : काँग्रेसला ‘महारणधुमाळी’त मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

•आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने धरली भाजपची वाट; हिंगोलीच्या राजकारणात मोठे फेरबदल
मुंबई | राज्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक घडामोडी घडली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. सकाळी विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर काही तासांतच त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यामुळे काँग्रेसचा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा बालेकिल्ला ढासळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमदारकीचा त्याग आणि भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या नाराजीच्या चर्चा रंगत होत्या. अखेर आज सकाळी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या चर्चांवर शिक्कामोर्तब केले. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईतील भाजप कार्यालयात धाव घेतली, जिथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. यावेळी हिंगोलीतून अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्या समर्थकांनी ‘राजीव सातव अमर रहे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
काँग्रेसला बसलेला सर्वात मोठा धक्का स्वर्गीय राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे नेला होता. मात्र, हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेत्यांशी असलेल्या मतभेदांमुळे त्या अस्वस्थ होत्या. वारंवार तक्रार करूनही काँग्रेस नेतृत्वाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
हिंगोलीत राजकीय समीकरणे बदलणार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. राजीव सातव यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा गट आता भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



