Palghar Bribe News : गवत खरेदीच्या ना हरकत दाखल्यासाठी लाच! सरपंच, ग्रामसेविका आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात

•10 हजारांची लाच घेताना कंत्राटी लिपिक रंगेहाथ; डहाणू तालुक्यातील सायवन ग्रामपंचायतीतील प्रकार
पालघर :- ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाकेबाज कारवाई करत डहाणू तालुक्यातील सायवन ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेविका आणि एका कंत्राटी लिपिकाला लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे. गवत खरेदीसाठी ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी या तिघांनी लाचेची मागणी केली होती आणि त्यातील 10 हजार रुपये स्वीकारताना लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
डहाणू परिसरातील एक तक्रारदार स्थानिक लोकांकडून गवत खरेदी करून तबेले, गोठे आणि कंपन्यांना पुरवठा करतात. त्यांना ओले आणि सुके गवत खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला हवा होता. यासाठी त्यांनी सायवन ग्रामपंचायतीत रीतसर अर्ज दाखल केला. मात्र, ग्रामसभेचे हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेविका ममता पिंपळे आणि सरपंच विष्णू बोरसा यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने 13 ऑगस्ट रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान केलेल्या पडताळणीमध्ये सरपंच आणि ग्रामसेविकेने 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, लाचलुचपत विभागाने सापळा रचला. सरपंच आणि ग्रामसेविकेच्या सांगण्यावरून कंत्राटी लिपिक यशवंत भोये याला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी सरपंच विष्णू बोरसा, ग्रामसेविका ममता पिंपळे आणि लिपिक यशवंत भोये यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामसेविका ममता पिंपळे यांना चौकशीनंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे, तर सरपंच आणि लिपिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथील अधीक्षक शिवराज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यात पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे, हवालदार रुपेश पाटील, सुनील पवार आणि महिला हवालदार विजया सुरवाडे यांनीही सहभाग घेतला.



