Mumbai News : निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी घेतले आक्षेप!

•शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे शिष्टमंडळात; ‘व्हीव्हीपॅट’ आणि ‘प्रभाग पद्धत’ वादाच्या भोवऱ्यात
मुंबई :- आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुकांपूर्वीच राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज (मंगळवार, 15 ऑक्टोबर) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर आक्षेप नोंदवले.
या ऐतिहासिक शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश होता. महाविकास आघाडीच्या (मविआ) नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



राज ठाकरेंचा थेट सवाल
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले, “निवडणूक लागली नाही, तरी मतदान नोंदणी बंद का केली?” तसेच, “वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, अशा अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत,” असेही त्यांनी निदर्शनास आणले.
निवेदनातील 6 प्रमुख मुद्दे
शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला दिलेल्या संयुक्त निवेदनात सहा महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित करत, आगामी निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे:
1.वगळलेल्या नावांचा तपशील द्या: 2024 च्या निवडणुकीत जी नावे वगळली गेली, त्यांची यादी व तपशील मतदारांना आणि राजकीय पक्षांना बघायला मिळत नाही. तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावा.
2.नवीन मतदार यादी लपवली का?: ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान यादीत समाविष्ट झालेली नावे व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही?
3.18 वर्षांवरील मतदारांना हक्क मिळावा: 1 जुलै 2025 नंतर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार नसेल, तर त्यांनी 5 वर्षे वाट बघायची का? निवडणुकीच्या घोषणेपूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळावा.
4.दुबार नोंदणीवर कारवाई हवी: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परराज्यातून आलेल्या मतदारांची दुबार नोंदणी होत आहे, जी कायद्याने गुन्हा आहे. बिहारमध्ये ‘डी-डुप्लिकेशन’ मोहीम राबवली जाते, मग महाराष्ट्रात तशी मोहीम का नाही?
5.व्हीव्हीपॅट का नाही?: आगामी महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नसल्याचे आयोग सांगत आहे, कारण पुरेशा ईव्हीएम नाहीत. ४ वर्षांत आयोगाने तयारी कशाची केली? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यामुळे व्हीव्हीपॅट अनिवार्य आहे.
6.मुंबईत बॅलेट पेपरचा पर्याय: प्रभाग पद्धतीने जिथे व्हीव्हीपॅट शक्य नाही, तिथे प्रभाग पद्धतच रद्द करावी. मुंबईत प्रभाग पद्धत नसतानाही जर आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम देऊ शकत नसेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्या.
या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या दबावाबाहेर येऊन या प्रश्नांची दखल घेऊन निश्चित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



