सातारा

Ajit Pawar : ‘समोरचा हिंदीत बोलला तरी आपण मराठीतच बोला’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनतेला आवाहन

•’मराठी भाषा नामशेष होऊ नये म्हणून घरातही मराठी बोला’; मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह

सातारा :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या स्वाभिमानावर आणि तिच्या संरक्षणावर जोर देत, महाराष्ट्रात सर्वांनी घरात आणि सार्वजनिक ठिकाणी मराठीतच बोलण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी साताऱ्याच्या वाई तालुक्यातील एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मातृभाषेचा अभिमान जपण्याचा आग्रह

अजित पवार यांनी उपस्थितांना मराठीत बोलण्याचा आग्रह धरत स्पष्ट केले की, “आपण आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी आपण घरात व महाराष्ट्रात मराठीतच बोलले पाहिजे.”

त्यांनी पुढे सांगितले की, समोरची व्यक्ती आपल्याशी हिंदीत बोलत असली तरी, आपण लगेच हिंदीत न बोलता मराठीतच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे ती व्यक्ती देखील मराठीत बोलेल. इंग्रजी जगभर फिरण्यासाठी लागते आणि हिंदी भारतातील अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे, ती शिकणे आवश्यक आहे, पण मराठी आपली मातृभाषा असल्याने ती उत्तमपणे बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे.

पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषा शिक्षणावर भर

यावेळी अजित पवार यांनी शिक्षण धोरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. त्यांनी ठामपणे सांगितले की, पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतच शिक्षण मिळायला हवे. हिंदी भाषा पाचवीपासून पुढे शिकवता येईल.

हा विचार महत्त्वाचा ठरतो कारण, राज्यातील महायुती सरकारने अलीकडेच पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिवसेना (उ.बा.ठा.), मनसे आणि इतर सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला होता. अजित पवार यांनी थेट उल्लेख टाळला असला तरी, त्यांचे विधान या निर्णयावरील अप्रत्यक्ष भाष्य मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0