Mira Bhayandar News : मराठीवरून मिरा भाईंदर पेटले! दुकाने बंद, मोर्चा, आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार

•मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेचा हिसका; व्यापारी संघटनांचा बंद आणि निषेध
भाईंदर | मिरा भाईंदर शहरात ‘मराठी’ या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता तीव्र आंदोलनात रुपांतरित झाला आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत तीव्र आंदोलन छेडले. या घटनेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असून विविध राजकीय पक्षांमधून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी मिरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका दुकानदाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनांनी निषेध करत शहरातील दुकाने बंद ठेवली आणि मोर्चा काढून आंदोलन केले.
व्यापाऱ्यांच्या संघटनांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेचा भाजप आणि शिवसेना पक्षांनी देखील निषेध केला आहे. व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मराठी भाषेचा सन्मान आमच्या हृदयात आहे, मात्र जबरदस्ती आणि हिंसा अशा कोणत्याही प्रकाराला आम्ही पाठिंबा देणार नाही.”
दरम्यान, मनसेने या आंदोलनाला भाजपप्रेरित असल्याचा आरोप केला असून, 7 जुलै रोजी शहरात प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. “मराठी माणसाला डिवचणाऱ्या कोणत्याही प्रकाराला आम्ही शांतपणे उत्तर देणार नाही. त्या दिवशी शहरातील नागरिकांपर्यंत संपूर्ण सत्य पोहोचवले जाईल,” असे मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर पोलिस प्रशासनाने देखील प्रतिक्रिया दिली असून, “शहरात सुरु असलेल्या तणावपूर्ण वातावरणावर आमचे लक्ष आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी शांतता राखावी,” असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.


