सिंधुदुर्ग

Malvan News : शंभरीही पार न करता चबुतरा खचला! मालवणच्या राजकोट किल्ल्यावर सरकारी बांधकामावर प्रश्नचिन्ह

•मुख्यमंत्र्यांची तातडीने दखल; मुख्य अभियंता घटनास्थळी रवाना

मालवण | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा भाग केवळ काही महिन्यांतच खचल्याने खळबळ उडाली आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेली ही घटना पुरवठा विभागाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. भराव खचल्याने मोठे भगदाड पडले असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी केली. मात्र, यामुळे तात्पुरता दिलासा मिळालेला असला तरी सरकारवर टीकेचे सावट गडद झाले आहे.

या घटनेची गंभीर दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांना घटनास्थळी तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते आज राजकोट किल्ल्यावर पाहणी करणार असून, संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र पुतळा आणि चबुतऱ्याला कोणतेही संरचनात्मक नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘हे सरकार महापुरुषांचे स्मारक उभारते की ठेकेदारांचे?’ – रोहित पवारांचा सवाल

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. “शंभर दिवसही न झालेले असताना पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचतो म्हणजे यामागे निकृष्ट दर्जाचे काम स्पष्ट होते. महापुरुषांच्या स्मारकांची भक्कम पायाभरणी सरकारने करावी, केवळ निविदाधारकांचे पोषण करू नये,” असा घणाघात त्यांनी केला.

सध्या राजकोट किल्ल्यावरील चबुतऱ्याच्या परिसरात पावसामुळे झालेली खचण थांबवण्यासाठी भराव टाकण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष चौकशीअंती खरे दोषी कोण हे पुढील अहवालातून स्पष्ट होणार आहे. शिवप्रेमींमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट असून, कामाच्या गुणवत्तेबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0