Maharashtra Politics : राऊत-फडणवीस यांची गुफ्तगू! – खासगी कार्यक्रमात 20 मिनिटांची चर्चा; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

•राजकारण तापलेले असताना मुख्यमंत्र्यांकडून संजय राऊत यांच्या प्रकृतीची आपुलकीने चौकशी; फडणवीस म्हणाले, “कोणीही आमचा शत्रू नाही.”
मुंबई :- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची काल (मंगळवारी) रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमात सुमारे 20 मिनिटे भेट झाली आणि त्यांच्यात संवाद झाला. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
प्रकृतीची आपुलकीने विचारपूस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे नुकतेच आजारपणामधून बरे झाले आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आपुलकीने संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांच्या उपचाराबद्दल माहिती घेतली. दोघांच्या संवादाचा एक फोटोही समोर आला असून, यामध्ये फडणवीस राऊत यांच्याशी चर्चा करत असल्याचे दिसत आहे.
राजकारण आणि वैयक्तिक संबंध
एकिकडे राजकीय टीका-टिप्पणीमुळे सध्याचे वातावरण तापलेले असताना, राज्याच्या दोन प्रमुख आणि विरोधी नेत्यांची ही भेट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या भेटीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही.”
यापूर्वी संजय राऊत यांनीही फडणवीसांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर भाष्य केले होते. राजकारणात कितीही शत्रूत्व असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर येता कामा नये, असे त्यांचे मत होते. आजारपणात पंतप्रधान मोदी, राज ठाकरे आणि फडणवीस यांनीही स्वतःहून फोन करून चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले होते.
ही भेट केवळ औपचारिक होती की यामागे काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा दडलेली आहे, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.


