Raigad News : धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत; ‘रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या’ मागणीनंतर अजित पवारांचे सूचक विधान

•सुनील तटकरेंच्या सत्कार सोहळ्यात मुंडेंची थेट मागणी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
रायगड :- गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पडद्यामागे गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रायगड येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यात मुंडेंनी थेट व्यासपीठावरून ‘आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या’ अशी मागणी केली. या मागणीनंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेनंतर मुंडेंच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमनाचे संकेत मिळाले आहेत.
मंचावरूनच केली मागणी
सुनिल तटकरे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सुनील तटकरे यांनी आम्हाला कायम वडिलांप्रमाणे मार्गदर्शन करत राहावे. चुकले तर कान धरावा… नाही चुकले तरी चालतं का?… पण आता रिकामं ठेवू नका… काहीतरी जबाबदारी द्या.” मुंडेंच्या या जाहीर मागणीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या मागणीवर सुनील तटकरे यांनी, ‘योग्य वेळी वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील’, अशी प्रतिक्रिया दिली होती.
अजित पवारांनी दिले संकेत
याच संदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर सूचक विधान केले. ‘धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा नक्कीच विचार केला जाईल’, असे म्हणत अजित पवारांनी मुंडेंच्या पुनर्वसनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात मुंडे पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर किंवा मंत्रिमंडळात दिसू शकतात अशी शक्यता बळावली आहे.
मागील काही काळापूर्वी एका हत्याकांडात निकटवर्तीयाचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. आता ते पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे.


