Mumbai Water Supply : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला, पाणीकपातीचे संकट टळले

•मध्य वैतरणा आणि मोडक सागरनंतर तानसाचीही भरारी; एकूण जलसाठा 86.88 टक्क्यांवर
मुंबई :- मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी 7 जुलै रोजी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे’ तीन दरवाजे उघडण्यात आले होते, तर 9 जुलै रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. आता पाठोपाठ तानसा तलावानेही पाणीदार मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
आज सकाळी 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 86.88 टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले असून, पुढील काळात पाण्याची चिंता मिटली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले तानसा धरण हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता 14,508 कोटी लीटर एवढी आहे.


