Kishori Pednekar : मुंबई महापौर आरक्षण वाद: “आदिवासींना जाणीवपूर्वक डावलले!”; किशोरी पेडणेकरांचा सरकारवर घणाघात; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

•एसटी प्रवर्गाचे नगरसेवक नसल्याने सोयीचे राजकारण केल्याचा आरोप; मंत्रालयात भाजप प्रतिनिधी आणि पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई l राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत आज पार पडली, मात्र मुंबईच्या आरक्षणाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुंबईचे महापौरपद पुन्हा एकदा ‘खुले’ (General) राहिल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रक्रियेवर थेट शंका उपस्थित करत, “सरकारने आपल्या सोयीनुसार आणि संख्याबळानुसार आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या आहेत,” असा खळबळजनक आरोप केला आहे.
‘एसटी’ (आदिवासी) प्रवर्ग का वगळला?
किशोरी पेडणेकर यांचा सर्वात मोठा आक्षेप अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाबाबत आहे. त्यांनी विचारले की, “मुंबई महापालिकेत आमचे (ठाकरे गटाचे) दोन एसटी नगरसेवक निवडून आले आहेत. चक्राकार पद्धतीनुसार या प्रवर्गाला संधी मिळणे अपेक्षित असताना त्यांना का वगळले? महायुतीकडे या प्रवर्गाचा एकही उमेदवार नाही, म्हणूनच आदिवासी प्रवर्गावर अन्याय केला आहे का?” अचानक ‘किमान तीन जागां’चा नवा नियम लावून आदिवासींना सत्तेपासून दूर ठेवल्याचा दावा त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणावरून टीका
ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाला डावलल्याचा आरोपही त्यांनी केला. “लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईचे महापौरपद ओबीसी महिला किंवा पुरुषासाठी राखीव असायला हवे होते. मात्र, रोटेशनच्या नावाखाली केवळ सोयीचे राजकारण करून हे पद पुन्हा सर्वसाधारण गटासाठी ठेवले गेले,” असे पेडणेकर म्हणाल्या.
मंत्रालयात जोरदार वादावादी
आरक्षण सोडतीवेळी मंत्रालयात उपस्थित असलेले भाजप प्रतिनिधी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. प्रशासनाने पेडणेकर यांचे आक्षेप नोंदवून घेतल्याचे सांगितले असले, तरी ठाकरे गट याविरोधात कायदेशीर लढाई किंवा तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नेमका पेच काय?
मुंबईत ठाकरे गटाचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे हे दोन नगरसेवक अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून निवडून आले आहेत. जर मुंबईचे महापौरपद ‘एसटी’साठी राखीव निघाले असते, तर महायुतीकडे उमेदवार नसल्याने ठाकरे गटाचा महापौर बसण्याची तांत्रिक शक्यता होती. मात्र, आता पद ‘खुले’ झाल्याने 89 नगरसेवक असलेल्या भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.


