संसदेत ‘कलगीतुरा’! राहुल गांधींच्या मुद्यावरून खर्गे आक्रमक, तर नड्डांचा ‘अबोध बालक’ शब्दावरून पलटवार

•पंतप्रधानांचे लोकसभेतील भाषण रखडल्याने राज्यसभेत गदारोळ; “सरकार काय लपवतंय?” खर्गेंचा सवाल, सत्ताधाऱ्यांकडून नियमांचे दाखले
ANI | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सातवा दिवसही प्रचंड गदारोळाचा ठरला. लोकसभेत विरोधकांच्या फलकबाजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देता आले नाही. याच मुद्द्यावरून आज राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सत्ताधारी मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. “राहुल गांधींच्या बोलण्याने सरकारला पोटशूळ का उठतोय?” असा थेट सवाल खर्गेंनी विचारल्याने सभागृहातील वातावरण तापले.
“सरकार त्रस्त का?” – मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल
राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, “लोकसभेत राहुल गांधींना काही विषयांवर बोलण्यापासून का रोखले जात आहे? केंद्र सरकार नेमके काय लपवू पाहत आहे? गेल्या चार दिवसांपासून सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही, याला जबाबदार कोण?” लोकसभेत पंतप्रधानांचे भाषण पूर्ण होऊ न शकल्याच्या पार्श्वभूमीवर खर्गेंनी सरकारला धारेवर धरले.
“काँग्रेसला एका ‘अबोध बालकाचे’ बंधक बनवू नका” – जे.पी. नड्डा
खर्गेंच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी खोचक टीका केली. “लोकसभेच्या कामकाजावर राज्यसभेत चर्चा करता येत नाही, हे प्राथमिक नियम विरोधकांना माहित नाहीत का?” असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर प्रहार केला की, “काँग्रेस पक्षाने स्वतःला एका ‘अबोध बालकाचे’ (राहुल गांधी) बंधक करू नये. लोकशाही धोक्यात आहे असे रडगाणे गाण्यापेक्षा विरोधकांनी सभागृह चालू द्यावे.”
किरेन रिजिजूंचे आवाहन;”पंतप्रधानांचे भाषण तरी ऐका”
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सभागृहाच्या परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले. “काँग्रेसला पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची इच्छा नसेल, तरी देशातील जनता आणि इतर सदस्य ते ऐकण्यास उत्सुक आहेत. आज तरी सर्व खासदारांनी नियमांचे पालन करून पंतप्रधानांना त्यांचे म्हणणे मांडू द्यावे,” असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.



