
Manoj Jarange Patil : गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण नको, मुंबईतील मोर्चा पुढे ढकला;भाजपचं मनोज जरांगेंना आवाहन
मुंबई :- उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणासाठी मुंबईवर धडकणाऱ्या मोर्चाबाबत भाजपच्या गोटातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शांततेत आणि उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवावर कुठलेही विरजण पडू नये, यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
उपाध्ये म्हणाले, “मराठा समाज हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करतो. याचवेळी मोर्चा काढल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ शकते आणि उत्सवाचा आनंद बाधित होऊ शकतो. गणेशोत्सवासाठी मुंबईची सुरक्षा यंत्रणाही सज्ज आहे, त्यामुळे या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी जरांगे पाटलांनी सहकार्य करावे.”
सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण
सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावर काम करत आहेत. पूर्वीच्या सरकारने केलेल्या चुकांमुळे आरक्षण टिकले नाही, मात्र आता पुन्हा एकदा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपाध्ये यांनी सांगितले. सरकारसमोर संघर्ष करण्याऐवजी सहकार्याची भूमिका घेतल्यास समाजाचे प्रश्नही सुटतील आणि सामाजिक सलोखाही टिकेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



