India Vs England : इतिहास रचला! बर्मिंगहॅममध्ये भारताचा इंग्लंडवर भेदक विजय!

•India Beats England In 2nd Test Series शुभमन गिलचा बॅटिंग धमाका, आकाशदीपची गोलंदाजीत आग – भारताची 336 धावांनी भक्कम बाजी
Ind vs Eng :- क्रिकेटच्या ऐतिहासिक एजबस्टन मैदानावर भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल 336 धावांनी विजय मिळवत मैदान गाजवलं. ही विजयगाथा विशेष ठरली कारण एजबस्टनवर भारताने याआधी कधीही कसोटी सामना जिंकलेला नव्हता.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 608 धावांचं प्रचंड लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांची अवस्था बिकट झाली. इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या 271 धावांवर आटोप झाला आणि भारताने सामना आपल्या नावावर केला.या विजयानंतर संपूर्ण भारतासाठी ही एक ऐतिहासिक घडी ठरली आहे. भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत मालिकेची स्थिती 1-1 ने बरोबरीत आणली.
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने दोन्ही डावांत मिळून 400 हून अधिक धावा करत जबरदस्त नेतृत्व सिद्ध केलं. त्याच्यासह जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनीही फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला बळ दिलं. गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
तरुण गोलंदाज आकाशदीप याने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एकाच सामन्यात 10 बळी घेण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत त्याने इंग्लंडचा डाव गारद केला. त्याचं अचूक लाइन-लेंग्थ आणि मोक्याच्या क्षणी घेतलेले बळी भारताच्या विजयात निर्णायक ठरले. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज यानेही प्रभावी गोलंदाजी केली.



