क्रीडा
Trending

Ind Vs SA Final : विश्वचषक विजयानंतर ‘क्रिकेटच्या देवा’पासून ‘हिटमॅन’पर्यंत दिग्गजांकडून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव!

India VS SA Final Match : सेहवाग म्हणाला ‘पिढीला स्वप्न दिले’, कोहलीने मानले ‘प्रेरणास्थान’, सचिनला आली १९८३ ची आठवण

नवी मुंबई :- हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिला आयसीसी विश्वचषक किताब जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांनी सोशल मीडिया आणि मैदानातून महिला संघाचे जोरदार अभिनंदन केले आहे. India Vs SA Match Final Update

दिग्गजांच्या प्रतिक्रिया

वीरेंद्र सेहवाग: “चॅम्पियन्स! प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट आणि त्यांच्या जिद्दीने संपूर्ण देशाचं हृदय जिंकलं. आमच्या विश्वविजेत्या मुलींचा आम्हाला अभिमान आहे. हरमनप्रीत आणि तिच्या संघाने संपूर्ण पिढीला जिंकण्याचं, लढण्याचं स्वप्न दिलं आहे.”

सचिन तेंडुलकर: “१९८३ च्या विजयाने अनेक पिढ्यांना मोठं स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. आज आपल्या महिला क्रिकेट संघाने तसंच काहीतरी विशेष केलं आहे. त्यांनी देशभरातील असंख्य मुलींना बॅट आणि बॉल हाती घेऊन मैदानात उतरायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला प्रेरित केलं आहे.”

विराट कोहली: “तुम्ही पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहात. तुमच्या निर्भय खेळाने आणि विश्वासाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे. तुम्ही सगळ्या गौरवाचे खरे हकदार आहात. हार्दिक अभिनंदन हरमन आणि संपूर्ण टीमला. जय हिंद.”

इरफान पठान: “भारतीय महिला संघाला विश्वचषक विजयाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त खेळ. दीप्ती शर्मा, तुम्ही अप्रतिम आहात. शेफाली, शाब्बास!”

हरभजन सिंह: “आपण चॅम्पियन्स आहोत! शाब्बास टीम इंडिया, आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे. भारत महान होता आणि सदैव महान राहील. जय हिंद.”

आर. अश्विन: “भारतीय महिला क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. ही एक अफलातून मोहीम होती. खेळाडू आणि अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक संघाचंही अभिनंदन.”

रोहित शर्मा: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने पत्नी रितिका सजदेहसह सामन्याच्या सुरुवातीपासूनच डी.वाय.पाटील स्टेडियमवर उपस्थित राहून महिला संघाला पाठिंबा दिला.

सामन्याचा आढावा

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ बाद २९८ धावा केल्या. यामध्ये शेफाली वर्माने ८७ आणि दीप्ती शर्माने ५८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गारद झाला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने ५ आणि शेफाली वर्माने २ बळी घेतले. भारताच्या या विजयाने महिला क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0