नागपूर

Sudhir Mungantiwar : “मला कोणाच्या ताकदीची गरज नाही!” मुनगंटीवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला; चंद्रपूरच्या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत ‘खदखद’ चव्हाट्यावर

•”जिल्ह्यात जाणीवपूर्वक गटबाजी पोसली; सरसंघचालकांविरुद्ध पत्र लिहिणाऱ्यांना पक्षात घेता?”; मुनगंटीवारांचा पक्षालाच ‘घरचा आहेर’

चंद्रपूर/नागपूर | नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात संपूर्ण राज्यात भाजपने मुसंडी मारली असली, तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. या पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. “चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची ताकद कमी पडली असेल तर आम्ही त्यांना बळ देऊ,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. “मी ताकद नसतानाही काम करणारा कार्यकर्ता आहे, मला कोणाच्या ताकदीची गरज नाही,” असे सांगत त्यांनी फडणवीसांचे विधान फेटाळून लावले.

पक्षांतर्गत गटबाजीवर ओढले ताशेरे

मुनगंटीवार यांनी पराभवाचे खापर पक्षातील अंतर्गत गटबाजीवर फोडले आहे. “जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केले गेले. ज्या लोकांनी सरसंघचालकांचा कार्यक्रम रद्द व्हावा म्हणून पत्र दिले होते, अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता? ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी कष्ट केले, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वानेच केला,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. काँग्रेसने आपल्या नेत्यांना बळ दिले, मात्र भाजपने आपल्याच नेत्यांचे पंख छाटल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यांनी नेहमीच भाजपला साथ दिली आहे. मात्र, इतकी वर्षे सत्ता असूनही या भागात विकासाचा वेग मंदावला आहे. “छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय वेगाने होत नाहीत, त्याचा परिणाम निकालात दिसून आला. या चार जिल्ह्यांमधून एकालाही मंत्रीपद दिले गेले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे,” असे सांगत मुनगंटीवारांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

राज्यभर दौऱ्याची घोषणा

आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर आपण शांत बसणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. “महापालिका निवडणुका संपल्यावर मी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. भाजपमध्ये कोणीही नाराज राहू शकत नाही, त्यामुळे मी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भेटी घेणार आहे,” असे त्यांनी सांगितले. 15 जानेवारीला होणाऱ्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0