Best Election : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; भाजपकडून जोरदार टीका

Best Election Result : भाजप नेते केशव उपाध्ये आणि आमदार प्रसाद लाड यांनी ‘शून्य’ म्हणत साधला निशाणा
मुंबई :- मुंबईतील प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाला असून, यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन लढलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ चा दारुण पराभव झाला आहे. 21 पैकी एकही जागा न जिंकल्याने, दोन्ही पक्षांसाठी हा निकाल आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपकडून जोरदार टीका
या पराभवानंतर भाजपने ठाकरे बंधूंना डिवचायला सुरुवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची खिल्ली उडवली आहे. केशव उपाध्ये यांनी एका प्रश्नाच्या माध्यमातून टोला लगावला. “एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?…
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा!
कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!
या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेल रिंगणात होते
शशांकराव पॅनेल: बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत या पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून विजय मिळवला.
सहकार समृद्धी पॅनेल: महायुतीमधील आमदार प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या संघटनांनी एकत्र येत 7 जागा जिंकल्या.
उत्कर्ष पॅनेल: शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला एकही जागा जिंकता आली नाही.
या पराभवामुळे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीवरील गेली नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे.



