Sharad Pawar : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘काळाची सर्वात मोठी गरज…’

•पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल शरद पवार म्हणाले की, देशातील निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुणे :- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या कारवाया पूर्णपणे नष्ट करणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.
गुरुवारी (24 एप्रिल) शरद पवार यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील रहिवासी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी भेट दिली आणि श्रद्धांजली वाहिली. त्यांनी दोघांच्याही मृतदेहांची दर्शन घेतले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
शरद पवार यांनी X वर लिहिले,कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप देसले यांच्यासह अनेक निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत, ही बाब अंतःकरणाला चटका लावणारी आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे, आजच्या काळाची गरज आहे.



