Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जमीन घोटाळ्या’चा स्फोट! अंबादास दानवेंचा 1150 कोटींचा आरोप, तर भुमरेंचा अब्रुनुकसानीचा सणसणीत इशारा

•जन्माच्या 14 वर्षे आधीच झाला जमिनीचा व्यवहार? | ‘हिबानामा’च्या तांत्रिक मुद्द्यावरून दानवेंचा भुमरेंवर प्रहार | खासदार संदीपान भुमरे यांनी फेटाळले सर्व आरोप
छत्रपती संभाजीनगर :- समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जटवाडा परिसरातील 23 एकर जमिनीच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार ‘युद्ध’ सुरू झाले आहे. दानवे यांनी या प्रकरणाला ‘शासकीय तिजोरीवरचा दरोडा’ म्हटले असून, भुमरे यांनी याला ‘मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण’ ठरवत प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे ‘कथित’ 1150 कोटींचा घोळ?
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक कागदपत्रे सादर करत असा दावा केला की, जटवाडा शिवारातील 23 एकर 30 गुंठे जमीन बळकावण्यासाठी खासदार भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावाचा वापर करण्यात आला. या जमिनीचे संपादन मूल्य तब्बल 1150 कोटी रुपये इतके प्रचंड आहे.
दानवेंनी उपस्थित केलेला सर्वात मोठा तांत्रिक मुद्दा असा की, या जमिनीचा व्यवहार (हिबानामा – बक्षीस पत्र) 1971 सालचा दाखवण्यात आला आहे. मात्र, ज्याच्या नावावर हा व्यवहार झाला, त्या जावेदचा जन्मच 1985 चा आहे. “एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या 14 वर्षे आधीच त्याच्या नावावर कोट्यवधींची जमीन कशी येऊ शकते?” असा तिखट सवाल करत दानवे यांनी या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खासदार संदीपान भुमरेंचे आक्रमक प्रत्युत्तर
आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “दानवे यांनी कागदपत्रांची किमान पडताळणी तरी करायला हवी होती. ज्या 174 गट नंबरचा ते उल्लेख करत आहेत, तो गट नंबरच त्या गावात अस्तित्वात नाही. तिथे केवळ 171 पर्यंतच गट आहेत. मुळात हिंदू महिला मालक असताना मुस्लिम कायद्यानुसार ‘हिबानामा’ कसा होऊ शकतो? हा केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.”
भुमरे यांनी पुढे ठणकावून सांगितले की, “जावेद माझा चालक असला तरी या व्यवहाराशी माझा किंवा त्याचा काहीही संबंध नाही. 1150 कोटी हा आकडा दानवेंनी कुठून शोधून काढला?”
पुढील अंक: न्यायालयीन लढाई?
अंबादास दानवे यांच्या सततच्या आरोपांना कंटाळून आता खासदार भुमरे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. “दानवे यांना आता सगळीकडे भुमरेच दिसू लागले आहेत. त्यांच्या आरोपांना मी न्यायालयातच चोख उत्तर देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.



