मुंबईठाणे
Trending

Supriya Sule : “स्वतःच्याच मंत्र्याच्या कार्यालयावर छापा? मग टीप कुणी दिली?”; मंत्रालयातील लाचखोरीवरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा

Supriya Sule On Devendra Fadnavis : नरहरी झिरवाळांच्या खात्यातील एसीबी कारवाईने राजकीय भूकंप; मंत्रालयाचे ‘सील’ झालेले कार्यालय आणि संशयाचा धूर; सुळेंकडून पारदर्शक चौकशीची मागणी

मुंबई | मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या धाडीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले असून, आता या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “स्वतःच्याच कॅबिनेटमधील मंत्र्याच्या कार्यालयावर मंत्रालयात घुसून कारवाई करणे, हे धक्कादायक असून यामागील खरा ‘मास्टरमाइंड’ कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आपल्याच माणसावर छापा? सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईच्या टायमिंगवर आणि पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुख्यमंत्री हे मंत्रालयाचे प्रमुख आहेत आणि गृहखातेही त्यांच्याकडेच आहे. एसीबी थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करते. मग मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरील मंत्र्याचे कार्यालय सील केले जाते, हे अनाकलनीय आहे. ही कारवाई करण्यासाठी नेमकी ‘टीप’ (Tip-off) कुणी दिली? तुम्हीच तुमच्या मंत्र्यांवर रेड टाकताय का?” असा बोचरा सवाल सुळे यांनी विचारला आहे.

मंत्री पक्षाचा नसून कॅबिनेटचा असतो

या प्रकरणाला राजकीय वळण न देता सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. “जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता, तेव्हा तुम्ही केवळ एका पक्षाचे नसून संपूर्ण राज्याचे असता. मंत्री हा एखाद्या विशिष्ट पक्षाचा नसून तो तुमच्या कॅबिनेटचा भाग असतो. आपल्याच घरात आपल्याच माणसावर छापा घालण्याचा हा प्रकार संशयास्पद वाटतो,” असेही त्या म्हणाल्या. या कारवाईमुळे सरकारमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

झिरवाळांच्या चौकशीत पारदर्शकता हवी

नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “झिरवाळ हे शून्यातून वर आलेले नेते आहेत. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखते. त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी अत्यंत पारदर्शकपणे व्हायला हवी. तसेच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकारावर तातडीने स्पष्टीकरण द्यायला हवे,” अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ आणि नवाब मलिक अडचणीत असतानाही मी त्यांच्या सोबत होते, असे सांगत त्यांनी झिरवाळांच्या बाबतीतही सहानुभूती व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0