
Navi Mumbai Muncipal Corporation On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या टीकेनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण; ‘मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा वेगळी’
मुंबई :- नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या यादीतील घोळावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी केलेल्या टीकेला राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदार आणि काही मतदारांच्या नावासमोर ‘सुलभ शौचालय’ पत्ता असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले होते.
दुबार मतदार आणि बोगस मतदारांच्या नावांवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. वाघमारे म्हणाले की, “मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो.”
ते पुढे म्हणाले की, “यादीतील दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेलं असल्यास ते तपासण्याची शहानिशाही आम्हीच करतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो,” असे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी जागाच नाही, पत्ताच नाही त्या ठिकाणी अनेक मतदारांची नावे यादीत कशी काय आली, असा थेट प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आला. यावर आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी हात झटकल्याचे दिसून आले. दिनेश वाघमारे म्हणाले की, “यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी जबाबदारी आहे ती आम्ही घेतो, केंद्रीय निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती ते पाहतात.”
एकंदरीत, मतदार यादीतील त्रुटींसाठी दुसऱ्या यंत्रणांना जबाबदार ठरवत, आयोगाने केवळ यादी वापरण्याची जबाबदारी आपली असल्याचे सूचित केले आहे.



