Keshav Upadhye On Uddhav Thackeray : भारत-पाकिस्तान सामन्यावरून भाजप-शिवसेनेत जुंपली; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

•’मुखवटे उघडले’, उपाध्ये यांची ट्वीटमधून टीका; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना केले लक्ष्य!
मुंबई :- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला परवानगी मिळाल्याच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आज बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भारत-पाकिस्तान सामना कोणत्याही परिस्थितीत होऊ नये असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे दोन मुखवटे आहेत. सोयीच्या वेळी चेहऱ्यावर चढवायचा मुखवटा वेगळा, आणि गैरसोयीच्या वेळी चेहरा झाकायचा मुखवटा वेगळा!…”
उपाध्ये यांनी या वादात जुन्या घटनांचा उल्लेख करत ठाकरेंना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साडू जावेद मियांदादला मातोश्रीवर पाहुणचाराच्या पायघड्या घालताना यांचा उत्साह उचंबळून येत होता.” तसेच, 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही 2011 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला शिवसेनेने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. तेव्हाचे एक खासदार भारत-पाकिस्तान मॅच खेळण्यास आमची हरकत नाही, असे म्हणाले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
“भारत-पाकिस्तान मॅच झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत झालेल्या वानखेडेवरील अंतिम सामना पाहण्यासाठी मुंबईवर हल्ला झालेला असूनही, भारत-पाकिस्तान झालेला सामना विसरून आदूबाळास घेऊन स्वतः कार चालवत वानखेडेवरही गेले होते…” असा गंभीर आरोपही उपाध्ये यांनी केला आहे.
या सर्व आरोपांच्या आधारे उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “ते मुखवटे आता बदलले आहेत, आणि तेव्हा गैरसोयीमुळे बंद असलेले मुखवटे आता सोयीच्या राजकारणासाठी उघडले आहेत.” उपाध्ये यांच्या या टीकेमुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.


