Uddhav Thackeray : “कम ऑन, किल मी!” — उद्धव ठाकरेंचं गद्दारांना थेट आव्हान

• “मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी दिल्लीतील नोकरांचे डाव”,वर्धापन दिनी भाजप-शिंदे गटावर घणाघात
मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापनदिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा झाला. मात्र, हा सोहळा फक्त एक उत्सव न राहता, भाजप आणि शिंदे गटावर झालेल्या तीव्र राजकीय टीकेने रणसंग्रामात रूपांतरित झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं — “गद्दारांपुढे झुकणार नाही, उलट सामना करायला तयार आहे. हिंमत असेल तर या — पण रुग्णवाहिका घेऊनच या!”
कार्यकर्त्यांना जोमाने प्रेरित करत उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्षाचे नाव, बाळासाहेबांचा ब्रँड मिटवायचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याचेच नामोनिशाण आम्ही राज्यातून पुसून टाकू.” त्यांचा रोख थेट भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर होता. ठाकरे म्हणाले, “मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून दिल्लीतील शेठजींचे नोकर आणि त्यांच्या नोकरांचे नोकर षड्यंत्र रचत आहेत.”
‘प्रहार’ डायलॉगचा उद्धव ठाकरेंकडून वापर
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील प्रसंग उधृत करत गद्दारांना उद्देशून ठणकावलं —
“कम ऑन, किल मी. हिंमत असेल तर या अंगावर. पण येताना रुग्णवाहिका घेऊन या, कारण जाताना आडवे होऊन जाल.”
राज ठाकरेंबरोबर युतीचे संकेत
शिवसेना भवनात आणि सभागृहाबाहेर चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युती. यावर स्पष्ट न बोलता, उद्धव ठाकरे म्हणाले, “काय होणार? होणार का? होणार की नाही? हे लवकरच कळेल. जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच मी करीन.” या वक्तव्यातून राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे.




