अखेर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन थांबलं! सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत

•कर्जमाफी व दिव्यांग मानधन वाढीच्या मागणीवरून 6 दिवसांचं उपोषण,उदय सामंतांकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला “थांब”
अमरावती | शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून अडगळीच्या स्थितीत अमरावतीत अन्नत्याग आंदोलन करत असलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर आज आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र त्यांनी हे आंदोलन मागे घेत नसून “फक्त पुढे ढकललं” आहे, असा स्पष्ट इशाराही दिला.
सरकारच्या वतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नंतर मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत लेखी आश्वासन दिल्यानंतर कडूंनी आपली अडगळ सोडली. स्वतः सामंत यांच्या हातून पाणी पिऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलं.
कडू म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रश्नावर बोलायला लावणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे.” त्यांनी पुन्हा एकदा सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देत, “त्यानंतर तीव्र आंदोलन पुन्हा उभं करू,” असा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, राज्यभरात उद्या (15 जून) करण्यात येणारा रास्ता रोको आंदोलनही आता रद्द करण्यात आला असून, बच्चू कडू यांनी जनतेला संयम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
हे आंदोलन केवळ राजकीय नसून, शेतकरी व दिव्यांगांसाठी असलेल्या असंतोषाचं प्रतिबिंब होतं, हे बच्चू कडू यांच्या निर्धारातून प्रकर्षानं जाणवत होतं. आता सरकार या आश्वासनांवर किती खरं उतरतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


