विजयाचा उत्सव काळवंटला: RCB चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी, 7 मृत्युमुखी

•जल्लोषाच्या भरात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अनर्थ,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, वाहतूक कोंडीने शहर ठप्प
ANI | तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयानंतरचा आनंद दुर्दैवाने शोकांतिका ठरला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजय जल्लोषाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, या प्रचंड गर्दीमुळे गेट क्रमांक 3 जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 10 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत RCB संघाने अखेर आयपीएल 2025 चा चषक पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर बंगळुरु शहरात कालपासून जल्लोष सुरु होता. मात्र आज संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि जीवघेण्या चेंगराचेंगरीला सामोरं जावं लागलं.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही चाहत्यांना दुखापती झाल्याची माहिती असून काही जखमींवर शिवाजीनगरमधील बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विजेते संघाच्या मैदानात येण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संघाचा सत्कार केला होता. पण मैदानाबाहेर चाहत्यांच्या उत्साहाने घेतलेला जीव ही दुर्दैवाची किनार बनली आहे.



