
Aditya Thackeray On Maharashtra Winter Session : ठाकरे गटाचे सर्वाधिक 20 आमदार असल्याने पदासाठी आग्रह; आदित्य ठाकरेंकडून ‘पेरलेली बातमी’ म्हणत खंडन, उलट ‘एका गटातून 22 आमदार जाणार’ असा गौप्यस्फोट
नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असला तरी, सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याचीच चर्चा जास्त रंगली आहे. महाविकास आघाडीमध्ये (मविआ) ठाकरे गट या पदासाठी आग्रही आहे, कारण त्यांच्याकडे मविआच्या 46 आमदारांमध्ये सर्वाधिक 20 आमदार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा आणि खंडन
आज सकाळपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्याऐवजी अचानक युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले. उद्धव ठाकरे स्वतः यासाठी प्रयत्न करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचीही चर्चा होती.
मात्र, आदित्य ठाकरे यांनी स्वतः ही बातमी पूर्णपणे फेटाळून लावली. ते म्हणाले, “ही बातमी पेरलेली आहे. या अफवा आहेत, यावर विश्वास ठेवू नका.” एवढेच नव्हे तर त्यांनी एका गटातून 22 आमदार पक्ष सोडून जाणार असल्याचा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
निलेश राणेंचे प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. “ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे 20 च आमदार राहिले आहेत. नको त्या विषयांमध्ये त्यांनी बोलू नये,” असे निलेश राणेंनी सुनावले.
विरोधी पक्षनेतेपदाचा पेच काय आहे?
288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एकूण जागांच्या किमान 10% जागा (म्हणजे 29 आमदार) असणे आवश्यक आहे.
सध्या मविआकडे एकूण 46 आमदार आहेत (ठाकरे गट 20, काँग्रेस 16, शरद पवार गट 10).
महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 आमदार नसल्यामुळे हे पद तांत्रिकदृष्ट्या रिक्त ठेवण्यात आले आहे.
यामुळेच महायुती सरकारला विरोधकांनी “संविधानाचा अपमान” केल्याचा आरोप केला आहे, तर सत्ताधाऱ्यांनी “संख्याबळ मिळवा आणि पद घ्या,” असा प्रतिटोला लगावला आहे.


