Sanjay Raut : “भय, भ्रष्टाचार आणि गद्दारीचा घाण वास… संजय राऊतांचा भाजप व बंडखोरांवर घणाघात!”

Sanjay Raut Latest News : गुलाबराव पाटलांवर थेट आरोप; “ईडीची भीतीने थरथर कापत होते” – संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | शिवसेना फोडणाऱ्या नेत्यांवर आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी सोमवारी घणाघाती टीका केली. “भय आणि भ्रष्टाचारामुळेच शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार-खासदार पक्ष सोडून गेले,” असा आरोप करत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही बोट ठेवलं आहे.
शिवसेनेच्या फुटीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “इम्पॉसिबल! पळून गेलेल्या डरपोक माणसाचे आरोप कुठे मनावर घेता? उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे निष्ठावंतांची शिवसेना आहे. गद्दार लोकांनी तिला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ते पळूनच गेले.”
यासोबतच राऊतांनी गुलाबराव पाटलांवरही थेट आरोप केला. “त्यांच्या खात्यात कुठूनतरी 40-50 हजार कोटी रुपये जमा झाले होते. ईडी-सीबीआय अटकेच्या भीतीने ते थरथर कापत होते. ही सगळी माहिती आमच्याकडे आहे,” असं राऊत म्हणाले. त्यांनी हा सर्व प्रकार ‘भ्रष्टाचाराचा कॅन्सर’ असं म्हणत भाजपच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले.
उद्धव ठाकरे यांचाही प्रयत्न निष्फळ
संजय राऊत यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरे यांनी सर्वांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मी स्वतः अनेक बैठकींमध्ये होतो. पण काहींना पैसा हवा होता, काहींना सत्ता, काहींवर तपास यंत्रणांचा दबाव होता – प्रत्येकाचं दुखणं वेगळं होतं.”
फडणवीसांना ‘बोलबच्चन’ अशी उपमा
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी ताशेरे ओढले. “शेतकऱ्यांची आत्महत्या एक लाखांपर्यंत जावी लागेल का, तेव्हा कर्जमाफी जाहीर करणार?” असा सवाल करत त्यांनी फडणवीसांना ‘बोलबच्चन’ अशी उपमा दिली.


